-
नवं जुनं विसरून सारे, राष्ट्रवादीच्या विकासाचे तोरणं बांधू प्रत्यके दारी : दसऱ्यानिमित्त अजितदादांनी पिंपरी चिंचवडकरांना घातली साद….
पिंपरी : भारतीय जनता पक्षाची महापालिकेत पाच वर्षे सत्ता होती. मात्र, या सत्ता काळात भाजपने शहरातील सोसायटी धारकांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे सोसायटी धारकांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटीबद्ध असल्याची ग्वाही राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवड मधील सोसायटी धारकांना दिली आहे.
शहरातील सोसायटी धारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी अजित पवार यांनी सोसायटीधारकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अजित पवार बोलत होते.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, नाना काटे, माजी नगरसेवक राहुल भोसले, मयूर कलाटे, श्याम लांडे, विनोद नढे, शहर प्रवक्ते विनायक रणसुभे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेविका माया बारणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, सतीश दरेकर, संजय वाबळे, राजेंद्र साळुंखे, राजेंद्र जगताप, स्वाती काटे, कैलास बारणे, वर्षा जगताप, अतुल शितोळे, दीपक साकोरे, प्रकाश सोमवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केले आहे. भामा-आसखेड धरणाचे पाणी शहराला मिळणार आहे. शहराला 24 तास पाणी कसे मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वाद मिटतील का? असे विचारले असता पवार म्हणाले, दोघांतील वाद पराकोटीला गेले आहेत. त्यात पुढाकार कोणी घ्यायचा हा प्रश्न असून शब्दाने शब्द वाढत जातो. जसे दिवस पुढे जातील तशी कटुता कमी होईल. जनतेसमोर जातील. आता मुंबईतील पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष राहील. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणूक निकालावर लक्ष असेल. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार की गोठवणार का? गोठवले तर दोघे दुसरे कोणते चिन्ह घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील या घडामोडींमुळे महाराष्ट्र अस्थिर होणार नसल्याचे पवार म्हणाले.
- थेरगावातून सोसायटी धारकांचे प्रश्र सोडविण्याचा श्रीगणेशा
शहरातील सोसायटी धारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे आणि माजी नगरसेविका माया बारणे यांनी पुढाकार घेतला आहे. याची सुरुवात थेरगावातून झाली आहे. या संवाद कार्यक्रमाला शहराच्या विविध भागातील सोसायटी धारक आपल्या समस्या घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचे उत्तम नियोजन संतोष बारणे आणि माया बारणे यांनी केले होते.
महागाईने जनता होरपळतेय !
सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या वाढत्या महागाई, बेरोजगारीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. महागाईने जनता होरपळत आहे. आता वर्षाला 15 घरगुती गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. पण, त्याच्या अटी शर्ती अतिशय जाचक आहेत. 15 गॅस मिळणे मुश्कील होणार आहे. दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात पिंपरी चिंचवड शहराचा विकास झपाट्याने झाला हे शहरातील नागरिकांनी पाहिले आहे आणि हे सर्व अजित पवार यांच्यामुळे झाले असे नागरिक जाहीर कबूल करतात. मात्र २०१७ मध्ये आमचे बटन दाबायला विसरले. लोकांनी आमच्यावर (राष्ट्रवादी काँग्रेस) दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी आणि माझे सहकारी यांनी मोठे योगदान दिले आहे ते यापुढेही कायम ठेवण्याचा आमचा मानस आहे. ही नगरी माझी नगरी म्हणून मी कायम काम करत असतो. “आज दसरा त्यामुळे २०१७ जे झाले ते सर्व विसरा….. असे म्हणत शहरवासीयांच्या त्या चुकीच्या निर्णयाची आठवण करून देत चिमटा काढला.
उत्सव आहे विजयाचा….
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
राष्ट्रवादीच्या विकासाचे तोरणं बांधू प्रत्येक दारी.. अशा अनोख्या दसऱ्याच्या शुभेच्छा देत महापालिका निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत यावी यासाठी अजितदादांनी शहरवासीयांना साद घातली.




