पिंपरी : आयटी पार्क हिंजवडीकडे जाण्या-या भूमकर चौक, विनोदेवस्ती व लक्ष्मी चौकातील मार्गावर एकेरी वाहतूक केल्याने कोंडी सुटण्याऐवजी त्यात भर पडली आहे. एकेरी वाहतूक पद्धतीमुळे नागरिक, व्यापारी यांना दोन किलोमीटरचा वळसा मारावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तत्काळ प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागिकांमधून होत आहे.
याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना काही नेत्यांनी निवेदन दिले आहे. त्यात आयटी पार्क हिंजवडीकडे जाण्या-या भूमकर चौक विनोदेवस्ती आणि लक्ष्मी चौकातील मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. या एकेरी वाहतूक पद्धतीमुळे त्या भागातील नागरिक, व्यापारी यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. किरकोळ कामासाठी सुद्धा दोन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. हे त्रासदायक ठरत आहे. त्याच भागातून जाताना वाहतूक कोंडी होत असून पादचा-यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे असे म्हटले आहे.




