पिंपरी : तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर यांचा यावर्षी १२ मे रोजी नगरपरिषदेच्या आवारातच चार मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घूण खून केला होता.
मावळ तालुका हादरवलेल्या आवारे खूनाच्या गुन्ह्यात गेले दोन महिने फरार असलेला या केसचा मुख्य सूत्रधार आणि माजी नगरसेवक चंद्रभान विश्वनाथ खळदे (वय ६३, रा . ऋतुचंद्र, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) याच्या पोलिसांनी काल (ता.८) नाशिक येथे मुसक्या आवळल्या. त्याला १३ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी वडगाव मावळ न्यायालयाने आज (ता.९) सुनावली.
तळेगाव नगर परिषदेच्या १५ वर्षे नगरसेवक राहिलेल्या चंद्रभानच्या अटकेने आवारे खून तपासाला वेगळे आणि निर्णायकी वळण मिळाले. तो आता अखेरच्या टप्यात आला आहे. नगपरिषदेतील एका ठेक्यावरून वाद झाल्याने आवारे यांनी नगपरिषद आवारातच चंद्रभान याच्या कानफाटीत मारली होती. त्याचा राग त्याचा इंजिनिअर मुलगा गौरवला सहन झाला नाही.
त्याने सुपारी देऊन आवारेंचा खून केल्याचे आतापर्यंतच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीत समोर आलेले आहे. तपासात मिळालेली एकेक कडी जोडत अत्यंत कौशल्याने पोलिसांनी या नाजूक व संवेदनशील अशा खूनाच्या गुन्ह्याचा तपास केला आहे. प्रथम त्यांनी मारेकऱ्यांच्या चौकशीतून त्यांना पळून जाण्यास मदत करणारा आणि सुपारी देणारा (गौरव खळदे) आरोपी पकडला.
किशोर यांच्या मातोश्री आणि तळेगावच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी स्थानिक आमदार मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सुनील शेळके (Sunil Shelke) व त्यांचे बंधू सुधाकर यांनी आपल्या मुलाचा खून घडवून आणल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार शेळके बंधूंना या गुन्ह्यात आरोपीही करण्यात आले आहे. म्हणून पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख एपीआय हरीश माने यांनी खबऱ्यांना कामाला लावून त्याला तांत्रिक तपासाची जोड देत त्यांनी आणि सहकाऱ्यांनी चंद्रभानची गठडी अखेरीस काल वळली.
दुसरीकडे या गुन्ह्यात आतापर्यंत पकडलेल्या सर्व आरोपींच्या चौकशीत शेळके बंधूंचे नाव कोणीही घेतलेले नाही. त्यांचा सहभाग दिसून आलेला नाही. आता चंद्रभान हा बहूधा शेवटचा आरोपी आहे. त्याच्या कबुलीतून तो काय सांगतो, यावर आता शेळके बंधूंना क्लीनचिट मिळणार की नाही, हे अवलंबून आहे. म्हणून त्याकडे संपूर्ण मावळ तालुका तेथील राष्ट्रवादी आणि शेळके समर्थकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आवारेंच्या (भाऊ) खूनाचा बदला खूनानेच घेण्याचा त्यांच्या समर्थक सराईत गुंडांनी रचलेला कट हा पोलिसानी नुकताच उधळून लावला. त्यासाठी मध्यप्रदेशातून आणलेला मोठा शस्त्रसाठा त्यांनी जप्त केला.
त्यातून मावळात आणखी एक राजकीय खून टाळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, आवारे खूनाचा तपास सुरुच आहे. फक्त आता तो निर्णायक आणि शेवटच्या वळणावर आल्याचे तो दाखल असलेल्या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी आज ‘सरकारनामा’ला सांगितले. सर्वबाजूंनी या गुन्ह्याचा तपास सुरु असून त्यात व त्यातही चंद्रभानच्या चौकशीतून शेळके बंधूंना क्लीन चिट मिळाली, तर आरोपपत्र सादर करताना योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे ते म्हणाले.



