पिंपरी : टाळगाव चिखली महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून मूलभूत सुविधांपासून वंचित होता. येथील समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्यानंतर येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत चिखली येथील पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे दिली.
चिखली जलशुद्धीकरण केंद्रापासून पंपिंगद्वारे जलवाहिन्यांमधून पाणी टाक्यांपर्यंत नेले जाईल, असे आश्वासन आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. यामुळे चिखलीतील तब्बल दोन लाख नागरिकांना पाणी टंचाईपासून मोठा दिलासा मिळाला असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.
चिखली ग्रामस्थांनी प्रलंबित प्रश्नांची नुकतीच उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर जंत्रीच सादर केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांसोबत बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, चिखली ग्रामस्थांमध्ये विकास साने, सुभाष मोरे, काळुराम यादव, सदाशिव नेवाळे, अमृत सोनावणे, नवीन बग, गणेश यादव हे नागरिक उपस्थित उपस्थित होते.
गव्हाणे म्हणाले, चिखली पाटीलनगर येथे महापालिकेने जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. यामध्ये पंपिंगची सुविधा करून येथून चिखली भागासाठी पाईपलाईन द्वारे थेट टाक्यांपर्यंत पाणी पोहोचवले जावे आणि या भागाला पाणीपुरवठा करावा असे नियोजित आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून केवळ पंप बसवला नाही म्हणून या भागाला पाणीपुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. ज्यामुळे सातत्याने या भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
ग्रामस्थांनी चिखली-सोनवणे वस्ती, चिखली- आकुर्डी, आकुर्डी ते पाटीलनगर, इंद्रप्रस्थ कार्यालय ते व्हिक्टोरिया सोसायटी अ रस्त्यांची कामे महत्त्वाच्या रखडल्याबाबत उपमुख्यमत्री पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यावर त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याशी चर्चा केली. रस्ते आणि पाण्याच्या समस्येबाबत नक्की कुठे काय अडले आहे, हेदेखील विचारून घेतले. त्यानंतर पाण्याचा प्रश्न तातडीने निकाली लावा, अशा सूचना आयुक्तांना दिल्या. येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत पंप बसवून टाक्यांपर्यंत पाणीपुरवठा झाला पाहिजे, असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे ग्रामस्थांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
____________
- कोणाचाही फोन येऊ द्या, कारवाई थांबवू नका’ उपमुख्यमंत्री पवार यांनी या बैठकीत पोलिस आयुक्तांना निर्देश
चिखली, मोशी चौकातील वाहतूक कोंडी, चोरी, लुटमारीबाबतच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. पालिका प्रशासनाने पोलिसांच्या माध्यमातून या भागातील अतिक्रमणे हटवून वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी. कोणत्याही नेत्याचा, पदाधिकाऱ्याचा फोन आला तरी अतिक्रमण कारवाई थांबवायची नाही, असे देखील यावेळी पवार यांनी निक्षून सांगितले.
चिखलीतील ८०० बेडचे हॉस्पिटल, चिखली शाळा क्रमांक ९२साठी क्रीडांगण, पाटीलनगर रस्त्यात अडचणीचा ठरणारा ट्रान्सफॉर्मर हटवणे आणि अग्निशमन यंत्रणा ही प्रस्तावित कामे करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्या. गट क्रमांक १६५३ आणि १६५४ या गायरान जमिनीवरील आरक्षणे तातडीने विकसित करावीत, सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिल्या आहेत.
अजित गव्हाणे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस




