पिंपरी : भाजपच्या वतीने या निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला जातोय. मात्र, भाजपला वेगवेगळ्या ग्रहांवर ८०० जागा मिळणार आहेत. महाराष्ट्रात उद्योग आले नाही तर उलट महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले आहेत. शिंदे सरकार मुळे महाराष्ट्राचा काय फायदा झाला? असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.
महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (दि. २३) उमेदवारी अर्ज भरला. वाघेरे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे रोहित पवार, शिवसेनेचे सचिन अहिर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपच्या वतीने अब की बार ४०० पारचा नारा दिला जात आहे. मात्र, या वेळी ते २०० पार देखील जाणार नाहीत. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजपच्या वतीने हिंदू – मुस्लिम विषय काढला जात आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना आपला पराभव दिसून आला आहे. भाजपच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. तरूणांना रोजगार मिळाला नाही. मुली-महिलांना असुरक्षित वातावरण आहे. प्रत्येक नागरिक नाखुश आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता पराभव दिसत असल्याने हिंदू मुस्लिम प्रचार केला जात असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. शिंदे सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा विकास थांबला असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला.




