
लोणावळा : बंदी असतानाही लोणावळा शहरातून जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जड अवजड वाहनांवर लोणावळा शहर वाहतूक विभागाने कठोर पावले उचलत दोन दिवसांत तब्बल 425 कारवाया केल्या. या कारवाईतून एकूण 4,67,500 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी 200 हून अधिक वाहनांवर कारवाई करत 2,08,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशीही 225 अवजड वाहनांवर कारवाई करून 2,59,500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या कामगिरीमुळे लोणावळा शहरातील नागरिकांकडून वाहतूक विभागाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
लोणावळा शहरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर तसेच या भागात सातत्याने होत असलेल्या अपघातामुळे जून 2024 मध्ये जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित करीत लोणावळा शहरातून होणाऱ्या जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कायमस्वरूपी बंदी घातली आहे. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवीत शहरातून सर्रासपणे ही वाहतूक सुरू आहे. एक आठवड्यापूर्वीच एका अवजड वाहणामुळे झालेल्या अपघातात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर माध्यमातून विषय चर्चेत आल्याने शहर वाहतूक पोलीसांनी नियम मोडत शहरात येणाऱ्या जड आणि अवजड वाहनांवर कारवाई सत्र सुरू केले आहे.
पो. नि. सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभाग प्रमुख पो. हवा. अनिल शिंदे, सचिन कडाळे, पो.कॉ.अमोल फाळके यांच्या मार्फत वरील कारवाया सुरू आहे. वाहतूक विभाग व पोलीस प्रशासनाच्या या निर्णायक कृतीमुळे लोणावळेकर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करीत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अरुण लाड, जिल्हा सदस्य दीपक कांबळे, वैभव देशपांडे, उमेश तारे, सुरेश जाणिरे यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलिसांचा सन्मान केला. पोलिसांच्या नियमित अशा कारवायांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि वाहनचालक शिस्त पाळतील. वाहतूक विभागाच्या या कठोर भूमिकेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला असून, भविष्यातही अशी कठोर कारवाई सुरू राहील अशी अपेक्षा अरुण लाड यांनी व्यक्त केली आहे.
