
पिंपरी : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुंडमळ्यात पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात अनेक (अंदाजे ३० ते ४०) पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी रात्री उशीरा चार जणांचा मृतदेह आढळून आला. यापैकी एकाची ओळख पटलेली नाही. चंद्रकांत साठले,रोहित माने, विहान माने अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत 51 जण जखमी असून त्याच्यावर नजीकच्या रूग्णलयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि. १५) सायंकाळी भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
इंदोरी गावाजवळील कुंडमळा इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली, त्यानंतर माध्यमांशी बोलतांना मंत्री महाजन म्हणाले, इंद्रायणी नदीवरील पुल दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमी व्यक्तींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.
घटनास्थळी एनडीआरएफ पथक, आपदा मित्र, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्था आदी घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. नागरिकांना वाचविण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. घडलेल्या घटनेची चौकशी केली जाईल. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेबाबत शासन सतर्क असून यापुढे पर्यटकांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.