तळेगाव दाभाडे : देहुगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सभेदरम्यान पंतप्रधान मोदी उपस्थित असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण करत भाजपचा निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाणीवपूर्वक भाषण करू न देणं हा भाजपाचा पूर्वनियोजित खेळी असल्याचा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
तसेच पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार आणि खासदारांना प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रण दिले नसल्याने त्यांनी नाराजीदेखील व्यक्त केली आहे. “अजित पवार हे स्पष्टपणे बोलणारे वक्ते आहेत. हाच स्पष्टपणा भाजपला रुचणारा नव्हता. त्यामुळे जाणीवपूर्वक अजित पवार यांना भाषण करू न देण हे भाजप पुरस्कृत कार्यक्रमाचे पूर्वनियोजन होते. पंतप्रधानांनी अजित पवार यांना आपण बोलावं अशी सूचना केली होती. कार्यक्रमापूर्वी अजित पवार यांच्या कार्यालयातून माहिती घेतली. त्यांच्या स्वीयसहाय्यक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं होतं, की प्रोटोकॉलमध्ये अजित पवार यांचं नाव नाही.
सर्वसामान्य कार्यकर्त्याला जसे निमंत्रण होते त्याचप्रमाणे आम्हालादेखील होते. प्रोटोकॉलप्रमाणे स्थानिक आमदार म्हणून आम्हाला निमंत्रण यायला हवं होतं. पंतप्रधान यांचं स्वागत करण्यासाठी निमंत्रण नव्हतं किंवा मंदिरात प्रवेश नव्हता. त्यामुळे हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कार्यक्रम झाला. भाजपकडून राज्यातील वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला राजकीय रंग देत त्याचा अवमान केला. मंदिरात कार्यक्रमावेळी ठराविक देवस्थानाची मंडळी आणि भाजपच्या नेत्यांना प्रवेश होता. भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले, चंद्रकांत पाटील यांना त्या व्यासपीठावर स्थान दिले होते. पण स्थानिक आमदार, खासदारांना जागा नव्हती का?’ असा प्रश्न आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला.
देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमांना स्थानिक आमदार खासदार यांना विश्वासात न घेता याला राजकीय रंग देण्यास हातभार लावला. या ठिकाणी राज्यातून हजारो वारकरी कार्यक्रमासाठी येणार होते. त्यामुळे कार्यक्रम सर्वसमावेशक व्हायला हवा होता. भाजप पक्षाकडून हा कार्यक्रम हायजॅक होत असताना आयोजक संस्थान पदाधिकाऱ्यांनी मूक संमती दिली. कार्यक्रमाच्या मंडपाचा व स्वागताचा करोड रुपयांचा खर्च देवस्थान समितीने केला का? का वारकरी संप्रदायाने देणगी गोळा करून केला की भाजप पक्षाकडून करण्यात आला. याचे उत्तर सामान्य जनतेला भाजप पक्षाने व देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी द्यायला हवे असा सवाल शेळके यांनी उपस्थित केला.




