तळेगाव – मावळ तालुक्याचे विद्यमान आणि उच्चशिक्षित आमदार सुनीलजी शेळके यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. परंतु दोन दिवसापूर्वी त्यांनी प्रसिध्दीस दिलेले पत्रक व प्रसारमाध्यमांसमोर केलेले विधान हे त्यांच्या राजकीय, शैक्षणिक व कायदेशीर अज्ञानातुन केलेले असल्याने, अशा बेताल व बेजबाबदार वक्तव्याचा मी निषेध करतो व त्यांनी माझ्याबद्दल केलेल्या वक्तव्याला मी काहीएक महत्त्व देत नाही.
मावळ तालुक्यातील बेकायदेशिर उत्खननाबाबत मी मा. हरित लवाद यांचेकडे याचिका दाखल केलेली आहे. सदरची याचिका न्यायाधिन असल्याने त्याबाबत कोणत्याही प्रकारचे विधान मी करणार नाही. त्याबाबत योग्य त्या चौकशी व निकालाअंती सर्व सत्यता समोर येईल असे बाळा भेगडे यांनी म्हटले आहे.
परंतु आमदारांनी उपस्थित केलेल्या भुमिपुत्रांबाबतच्या आस्थेबद्दल मला खुप आश्चर्य वाटत आहे, कारण मावळ तालुक्यातील भुमिपुत्रांना ज्ञानदान करणाऱ्या व ज्ञानाची पंढरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या इंद्रायणी विद्या मंदीर संस्थेच्या नियोजित विद्यालयाच्या बांधकामास स्थगिती देण्याकरीता राजकीय दबाब निर्माण करून सदरच्या बांधकामाची चौकशी करण्याकरीता मा. जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांबरोबर आमदारांनी पत्रव्यवहार करून सदरचे बांधकामास स्थगिती देण्यात आलेली आहे. सुमारे ५००० विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या, मावळभुषण मा. कृष्णराव भेगडे साहेब व कै. केशवराव वाडेकर साहेब व अनेक जेष्ठ संचालकांनी जतन केलेली व उद्योजक मा. रामदासआप्पा काकडे यांचे नेतृत्वात संस्था विकसित होत असताना, आमदारांच्या कर्तुत्वांमुळे संस्थेच्या विकासाला खिळ बसली व विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
तसेच गेले अडीच वर्षामध्ये स्थानिक भुमिपुत्र कर्ज घेऊन व्यवसायांमध्ये स्थिरस्थावर होत असताना, राजकीय आकसापोटी शासकीय यंत्रणेस वेठीस धरून, भुमिपुत्रांच्या व्यवसायावर व घरादारांवर नांगर फिरवण्याचे आदेश देताना, स्थानिक भुमिपुत्रांविषयीची तळमळ कुठे धूळ खायला गेली होती आमदार साहेब हे तुमच वागण बर नव्हं … !




