पिंपरी : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा (BJP) करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 508 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्टेशनसह आकुर्डी रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येणार आहे अशी माहिती पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, भाजपा शहर सरचिटणीस राजू दुर्गे, माजी गटनेते नामदेव ढाके, प्रदेश युवा मोर्चा सचिव अजित कुलथे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे आदी उपस्थित होते.
जगताप यांनी सांगितले की, ‘आझादी का अमृत महोत्सव’ देशभर साजरा केला जात असून देशाला विकासाची नवी दिशा देण्याचा संकल्प करण्यात आला. ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये केंद्र सरकारने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले.
या निमित्त पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीने 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये “हर घर तिरंगा ” आणि “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान प्रभावीपणे पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक प्रभागात असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ एक फलक लावण्यात येणार आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.




