
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार मावळमधील यशस्वी उद्योजक रामदास काकडे यांना पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात उद्योगभूषण पुरस्कार रवींद्र डोमाळे, सोनाली ढोकले यांना ग्रामभूषण पुरस्कार, दीपक भोंडवे यांना कृषी उद्योगभूषण पुरस्कार, निलेश रामाणे यांना उद्योग विकास पुरस्कार,अमर लाड यांना युवा उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी कृषिभूषण सुदाम भोरे, आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन इटकर, कामगारभूषण पुरूषोत्तम सदाफुले, टाटा उद्योग समूहाचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष मनोहर पारोळकर, सुनंदा काकडे, सुरेश कंक आदी उपस्थित होते.
रामदास काकडे म्हणाले, भारत हा खेड्यांचा देश आहे. गाव सुधारले, तर देश पुढे जाईल, या जेआरडी टाटा यांच्या विचाराने मार्गक्रमण करीत आलो आहे. त्यांच्या विचारातूनच पुढील वाटचालीला उर्मी मिळाली. आई – वडील, पत्नी, मित्र,नातेवाईक, कामगार तसेच ज्या ज्या हातांनी हा उद्योग पुढे नेण्यास हातभार लावला, या सर्वांना या पुरस्काराचे श्रेय जाते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी व टाटांचे विचार सोबत घेऊन काम करीत आहे. प्रत्येक तरुणाने जेआरडी टाटांचे आत्मचरित्र वाचून त्याचे आत्मपरीक्षण करावे. तुम्ही जे जे करा ते सर्वोत्तम करा, हा टाटांचा विचार तरुणाईने अंगीकारणे गरजेचे आहे.




