
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील ५६० एसटी स्थानकांतील पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत राज्यातील २९१ स्थानकांतील स्वच्छतेचा दर्जा वाईट असून, केवळ २८ स्थानकांमध्ये चांगल्या प्रकारे स्वच्छता राखली जात असल्याचे वास्तव एसटी महामंडळाच्या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ मे रोजी एसटी स्थानकांबाबतच्या मोहिमेची घोषणा केली. दर दोन महिन्यांनी स्थानकांचे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल जाहीर करण्यात येणार आहे. मे आणि जून महिन्याचा सर्वेक्षण अहवाल पूर्ण झाला आहे. एसटी मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रल स्थानकातील स्वच्छतेचा दर्जा मध्यम स्वरूपाचा आहे. मुंबई विभागातील उरण स्थानकाला १०० पैकी सर्वांत कमी ३८ गुण मिळाले आहेत. परळ स्थानकाला ५१ गुणांवर समाधान मानावे लागले आहे. दादर एसी बसस्थानक (४४), कुर्ला नेहरू नगर (४७) आणि पनवेल (४१ गुण) देण्यात आले आहे.
ठाणे विभागातील वंदना बसस्थानक ६० गुणांसह मध्यम दर्जामध्ये आहे. ठाणे बस स्थानकासह (३७), बोरिवली सुकुरवाडी (४८) आणि नॅन्सी कॉलनी (३३), भिवंडी (३१), कल्याण (३०), डोंबिवली (३२), विठ्ठलवाडी (३८), बदलापूर (२८) मुरबाड (२७), शहापूर (३२) आणि वाडा (४३) या स्थानकांची स्थिती दयनीय आहे, असे एसटीतील स्वच्छ स्थानक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांना वर्षभर स्वच्छ, सुंदर स्थानकातून प्रवास करता यावा, यासाठी अभियान राबवले जात असून, वाईट दर्जाच्या स्थानकांमध्ये तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागप्रमुखांना आणि स्थानक प्रमुखांना देण्यात आल्या आहेत, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.



