- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे चिंचवड येथील राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात संपन्न
- राज्यभरातील विविध पुरस्कार देऊन पत्रकारांचा सन्मान.
पुणे :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शनिवारी (दि.१६) चिंचवड (पुणे) येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्धाटन संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वास आरोटे,उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ, ज्येष्ठ लेखक अरविंद जगताप तसेच ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले .
या प्रसंगी असंघटित कामगारांचे नेते समाजसेवक बाबा आढाव , भोसरी मतदार संघाचे आ.महेश लांडगे, शिरूर मतदारसंघाचे मा. खासदार डॉ.अमोल कोल्हे , आ.उमा खापरे,राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर,नगरसेवक मोरेश्वर भोंडवे,चेतन भुजबळ वैभव स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रस्ताविक करताना नितीन शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आम्ही वर्षभर विविध कार्यक्रम राबवत असतो. तसेच महाराष्ट्रातीलही विविध पत्रकारांचे संघटन करून त्यांचे प्रश्न जाणून त्यांना न्याय देण्याचे व अडचणी सोडवण्याचे काम करत असतो. राज्यभरातील पत्रकारांना संघटित करून विविध प्रश्नांवर चर्चा होणे महत्वाचे आहे. पत्रकारांची एकजूट निर्माण करणे यासाठी संघटना कार्यरत असते. तसेच या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
डॉ. उदय निरगुडकर म्हणाले पत्रकारितेच्या क्षेत्रात AI चा शिरकाव पत्रकारांच्या बेरोजगारीत वाढ करणारा भासत आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारचे चैनल, यूट्यूब चैनल, डिजिटल माध्यम उदयास येत आहेत विविध माध्यमे आपापल्या पद्धतीने उत्तम रित्या सामाजिक प्रश्नांची मांडणी करत आहेत. हे करत असताना काही महत्वाच्या गोष्टीचे भान ठेवणे महत्वाचे आहे. पत्रकारांनी निष्पक्षपातीपणा, विश्वासार्हता टिकविणे अत्यावश्यक आहे.
बातमी की जाहिरात या द्विधा संकटातूनही पत्रकाराला जावे लागते.
परिसंवाद सत्रामध्ये ज्येष्ठ लेखक अरविंद जगताप, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव सहभागी झाले त्यांनी अमृतकाळातील माध्यम स्वातंत्र्य, भविष्य आणि पत्रकारितेतील राम यावर चर्चा करताना माध्यमांना आज सर्दी झाली आहे का? आजचा निर्भिड पत्रकार कोण? पत्रकारांवर कोणकोणत्या प्रकारचे दबाव असतात? पत्रकारितेत युट्यूब महत्त्वाचा रोल निभावत आहे का? शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक यांचे प्रश्न माध्यम निष्पक्ष मांडतात का? यावर मान्यवरांनी आपली निर्भिड मते मांडली.
दुसऱ्या सूत्रामध्ये बोलताना प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वास आरोटे म्हणाले की सर्व जिल्ह्यातील पत्रकारांवरचे संघटन जाळ निर्माण करून पत्रकार मजबुती देणे हा या अधिवेशनात्मक उद्देश आहे
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले की पत्रकार कोणाचाच नसतो तो बातमीचा असतो. बर लिहिण्यापेक्षा खरं लिहिणे जास्त अपेक्षित आहे. पत्रकारांचे आर्थिक धोरण यावरही मंथन होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यभरात पंचविस हजाराहुन अधिक पत्रकार सदस्य आहेत.त्यांच्या विविध प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कार्यरत आहे.
● मी सत्यशोधक पत्रकार नेहमीच लढतो.
बाबा आढाव म्हणाले पत्रकारांच्या जीवनामध्ये नेहमीच संघर्ष व लेखणीतून लढाया असतात. राज्यातील सर्व पत्रकार एका ठिकाणी पाहण्याचा हा पहिलाच योग असावा पत्रकार हा समाजातील विविध प्रकारच्या समस्यांची नाडी जाणणारा डॉक्टरच असतो. त्यामुळे त्याने निर्भयपणे उत्तम लिखाण मांडावे. जेणेकरून सामाजिक हित जपण्यासाठी मदत होईल.
शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अधिवेशनास शुभेच्छा देत सांगितले की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो आज पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अनेक आव्हाने आहेत. लोकशाहीला मजबूत ठेवण्यासाठी निर्भीड पत्रकारिता आवश्यक आहे
आमदार बच्चू कडू म्हणाले की एक सामान्य घरातील कार्यकर्ता ते आमदार होणं हे पत्रकारांमुळे शक्य झाले मात्र आज जाहिरात व पत्रकारिता याची रसमिसळ होत आहे. त्यामुळे चांगल्या पत्रकारांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी हातातील लेखणी मजबूत असावी असा सल्ला त्यांनी दिला.
● एका व्यक्तीची बातमी म्हणजे वर्तमानपत्र नव्हे तर सर्वसामान्यांची बातमी म्हणजे वर्तमानपत्र ओळख हवी.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की पत्रकारांमुळे समाजातील विविध घटकांसाठी लढणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची भेट अधिवेशनाच्या निमित्ताने झाली. सर्वसामान्यांची बातमी म्हणजे वर्तमानपत्र ही वर्तमानपत्राची ओळख असायला हवी. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू नये असं म्हटलं जातं ते मतदानाच्या बाबतीतही होतं मात्र आता मतदान करताना भविष्याचा ही विचार करायला हवा. हा खरच अमृत काळ आहे का? याचे आत्मपरीक्षण करायला हवे
विजय जगदाळे, विकास शिंदे, बेलाजी पात्रे, प्रमोद सस्ते, प्रसाद वडघुले, सागर झगडे,शशिकांत जाधव, प्रकाश लोखंडे, सुनील बेणके, संजय भेंडे, संदीप सोनार आदींनी केले. सूत्रसंचालन अश्विनी सातव व अतुल क्षीरसागर यांनी केले.मिलिंद संधान, सागर झगडे यांनी आभार मानले.




