
पिंपरी : शहराची आगामी ४० वर्षांत होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करून चिखलीत २०० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिली. त्यामुळे केंद्राचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून २६७ एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी भाजप सत्ताकाळात प्रकल्प हाती घेण्यात आले. त्याअंतर्गत चिखली येथे १०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. त्याद्वारे समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा सुरू झाला आहे. महापालिका हद्दीत १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये वाढलेली लोकसंख्या आणि पाण्याची गरज याचा विचार करता भामा आसखेड प्रकल्पांतर्गत चिखली येथे प्रस्तावित २०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रामुळे चिखली, तळवडे, मोशी, चऱ्होली, दिघी, डुडूळगाव, जाधववाडी या गावांतील पाणी प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे.




