)
मुंबई : बारामती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यातील लढत आता रंगत चालली आहे. दोन्ही उमेदवारांचा पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असताना आता आणखीन एका विषयावरून वाद पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यावरुन, पवार कुटुंबातील सुप्रिया सुळेंच्या मैदानात उतरलेल्या सदस्यांनी पार्थ पवार यांना देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेवरुन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आमदार रोहित पवार यांनी तर, पार्थ पवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, असे म्हटले आहे.
वाय दर्जाची सुरक्षा ही कमी आहे, पार्थ मोठा नेता आहे, त्यांना झेड सेक्युरिटी द्यायला हवी होती. अजून 4-5 गाड्या वाढवायला पाहिजे होत्या. काय झालंय, कोयता गँग सामान्य लोकांना त्रास देतेय. मर्डर सामान्य लोकांचे होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे, सामान्य लोकांना सुरक्षा देण्याची काही गरज नाही. नेत्यांच्या मुलांना सेक्युरिटी दिली पाहिजे, ते देवेंद्र फडणवीस करत आहेत. सागर बंगल्याचं तेवढंच काम आहे. नेत्यांना सांभाळणं आणि सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडणं. सागर बंगला खूप चांगलं काम करत आहे. माझं असं मत आहे की, पार्थला अजून दोन-तीन सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती, रणगाडा जर कुठं चालत असेल तर रणगाडाही द्यावा, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी पार्थ यांच्यावर उपहासात्मक बोचरी टीका केली.
रोहित अन् युगेंद्र यांच्यासाठीही मागणी
पार्थ पवार यांच्या सुरक्षितेत वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. पवार कुटुंबातील युगेंद्र पवार आणि रोहित पवार हे सुप्रिया सुळे यांचा बारामती मध्ये प्रचार करत आहेत. युगेंद्र पवार यांना काही दिवसांपूर्वी घेराव घालण्यात आला होता. त्यामुळे, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी देखील केली होती. मात्र ती अद्याप मान्य झालेली नाही. दरम्यान, बारामतीत एकूण ३८ उमेदवारांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. मात्र, मुख्य लढत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही उमेदवार प्रचार करताना बघायला मिळत आहेत. वाय प्लस सुरक्षा ही खरंतर अतिशय महत्वाच्या व्यक्तींना, मोठ्या राजकीय नेत्यांना किंवा ज्यांच्या जीवाला धोका आहे, अशा व्यक्तींना दिली जाते. पण, पार्थ पवार यांच्याकडे कुठलेही राजकीय पद नसताना त्यांना सुरक्षा का देण्यात आली असा प्रश्न विचारला जातोय. त्यांच्या जीवाला धोका आहे का? त्यांना खरंच सुरेक्षेची गरज आहे, म्हणून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे का असे प्रश्न दबक्या आवाजात विचारले जातायत.




