सातारा : भारतीय जनता पक्षानं गेल्या दहा वर्षांत देशाचा कायापालट केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दूरदृष्टी असलेले खंबीर नेतृत्व देशाला मिळालंय. तसंच मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा हा देशाचे भविष्य, तर काँग्रेस हा भूतकाळ असल्याचा हल्लाबोल सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केलाय.
काँग्रेसमधील अनेकांचा उमेदीचा काळ वाया गेला
कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत असताना उदयनराजे भोसले म्हणाले की, “महिला सक्षमीकरण, तरुणांच्या हाताला रोजगार, संरक्षण दलांची सज्जता, www सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील प्रगती ही सर्व कार्ये मोदींच्या नेतृत्वाखाली झाली आहेत. काँग्रेसमध्ये अनेकांचा उमेदीचा काळ वाया गेला. काँग्रेसला दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळं देशातील जनतेला गृहीत धरण्यात आलं. आता मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचा चांगला पर्याय निर्माण झाल्यानं गेल्या दहा वर्षांपासून जनता भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे”, असं ते म्हणाले.
मोदी देशाचं नेतृत्व करणार
राज्यातील महायुती ही देशातील एनडीएचा घटक आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी हेच देशाचं नेतृत्व करणार, हे निश्चित झालंय. परंतु, काँग्रेसच्या पुढाकारानं निर्माण झालेल्या इंडिया आघाडीला नेतृत्वच नसल्याची टीका खासदार उदयनराजेंनी केली. तसंच नेतृत्व नसलेली इंडिया आघाडी देशाचा काय विकास करणार?, असा खोचक सवालही उदयनराजेंनी यावेळी केला.

)

