पिंपरी : देशात एनडीएने बहुमत प्राप्त केले असून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासबोतच ३० खासदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कोणती खाती मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रात शिंदे गटाचे ७, अजित पवार गटाचे एक व भाजपचे ९ खासदार निवडून आले आहेत. शिंदे गटासाठी केंद्रात दोन कॅबिनेट मंत्रीपदे मिळत असल्याचे माहिती समोर येताच या पदासाठी मुख्यमंत्र्यांनी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि मावळमधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले श्रीरंग बारणे यांच्या नावाची निवड केल्याचे सांगितले जात आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी या नावांविषयी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधल्याचे समजते.
केंद्रात महायुती महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला यंदा किमान दोन कॅबिनेट मंत्रीपदे मिळतील अशी शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून यासाठी काही नावे चर्चेत असली तरी त्यांचे खासदार पूत्र श्रीकांत शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी पक्षाच्या काही खासदारांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना भेटून केली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदे यांचा समावेश असणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. शिवेसना हा पक्ष माझी खासगी मालमत्ता नाही. श्रीकांत यांनाही पक्षाच्या कामातच स्वारस्य आहे. त्यामुळे शिवसेनेतील मंत्रिमंडळाचा निर्णय गुणवत्तेनुसार होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.




