राज्यात गुन्हेगारी वाढली
पुणे महिला पोलीस हल्ल्यासंदर्भात विचारलं असता सुप्रिया सुळेंनी, “आज राज्य परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पुण्यात सातत्याने गुन्हेगारी वाढत आहे. मी आरोप करत नाही, हे डेटा सांगतोय. केंद्र सरकारचा डेटा महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढल्याचं सांगतोय. अगोदर नागपूर केंद्र असायचं आता पुणे आहे. “पुण्यात जे घडलं ते दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकार काय करते? महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतात? सातत्याने हे सुरू आहे. या राज्यात सर्व सावळा गोंधळ सुरू आहे. 200 आमदारांचे सरकार आहे पण तुमच्या आणि माझ्या पदरात काय पडले विकास कोणाचा केला या सरकारने? महाराष्ट्राचा आज देशात नंबर खाली जायला लागला आहे,” अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.
निधीसाठी अजित पवारांना पत्र
जिल्हा नियोजन मंडळ निधीसंदर्भात अजित पवारांना लिहिलेल्या पत्राबद्दल बोलताना सुप्रिया सुळेंनी, “पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी पत्र लिहिलं आहे याचा कारण की अमोल कोल्हे आणि मला निधी मिळत नाही. जनतेच्या कामासाठी आम्ही निधी मागत आहोत. आम्ही निवडून आलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहोत. पाच टक्क्यांचा तर आमचा अधिकार आहे ना? आम्ही आमच्या कामसाठी निधी मागत नाही. लोकांचा विकास हवा आहे. आम्हाला क्रेडीट नको. आमचं काम आहे लोकांच्या सेवेसाठी आम्ही निधी मागत आहोत,” असं म्हटलं.
काका-पुतण्या लढाई
बारामतीमधील विधानसभेच्या संभाव्य काका-पुतण्या लढाईबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळेंनी, “माझ्यासाठी विधानसभेची निवडणूक इंडिया आलायसेस विरुध्द एनडीए अशी आहे. मी कोणतीही निवडणूक व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. माझी लढाई ही वैचारिक असते. हे माझ्या कृतीतून आणि भाषणात दिसते,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.




