पिंपरी : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. हा वाद आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचला आहे. स्वपक्षातील आव्हान आणि महायुतीतील घटक पक्षाकडून घेरले गेलेले शेळके यांनी, ‘मावळ भाजप आणि प्रदेश कार्यकारणी यांच्यात समन्वय होत नाही, तोपर्यंत आपली उमेदवारी जाहीर करू नका,’ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर तरी हा वाद मिटणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मावळ मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१९ मध्ये उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी ऐन वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडणूक लढले आणि ते मोठ्या फरकाने जिंकले. तेव्हापासून आमदार शेळके आणि भाजपमध्ये मतभेद आहेत. तीन वर्षे दोन्हीकडचे नेते एका व्यासपीठावर एकत्र येणेही टाळत होते. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष महायुतीसोबत आल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही पक्ष एकत्र दिसले. मात्र, आता विधानसभा निवडणुकीसाठी मावळ भाजपने आमदार शेळके यांना कडाडून विरोध सुरू केला आहे. ‘आमदारांनी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला, गळचेपी केली, त्यामुळे शेळके यांचे काम करणार नाही,’ असा ठरावच भाजपने यापूर्वी मंजूर केला आहे.
- ‘मविआ’चा अपक्षाला पाठिंबा नाही’
‘अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा कोणताही निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला नाही. निवडून येणारा नेता महाविकास आघाडीत येत असेल, तर विरोध नाही. वरिष्ठांनी त्या नेत्याला उमेदवारी दिली, तर काम केले जाईल. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. त्यामुळे पक्षाचा आदेश पाळू,’ असे मावळातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
- देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला बाळा भेगडे
माजी आमदार बाळा भेगडे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ‘पक्षाच्या भूमिकेनुसार काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. मावळात भाजपची ताकद आहे. पक्ष आणि राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येण्यासाठी शक्य ते केले जाईल. जागावाटपानंतर चित्र स्पष्ट होईल. मावळच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसून आम्ही आशावादी आहोत,’ असे भेगडे यांनी सांगितले.
मावळात गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात लढत होत होती. आता राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष महायुतीत आला आहे. ‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा’ असे महायुतीचे सूत्र ठरले आहे. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच मित्रपक्ष भाजपसह त्यांना स्वपक्षातूनही आव्हान निर्माण झाले. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपद नाकारले आहे. ते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. भाजपमधील नाराज पदाधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा असल्याचे दिसून येते. तळेगाव दाभाडे येथील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील भेगडे मंडळींचा कौटुंबिक संवाद आणि स्नेह मेळावा नुकताच पार पडला. त्यातच बापूसाहेब भेगडे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या पाठिंब्यावर अपक्ष लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘भाजपमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. जाणीवपूर्वक महायुतीत तेढ निर्माण करण्याची रणनीती आखत आहेत. भाजपमधील नेत्यांनी त्यांचा पक्ष एकसंघ कसा ठेवता येईल हे पाहावे. आमच्याकडे येऊन लुडबुड करायची आणि भांडण लावायचे हे उपदव्याप करू नयेत,’ असा इशारा सुनील शेळके यांनी दिला आहे.
ते म्हणाले, ‘शरद पवार यांचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार उभा करण्याचे नियोजन सुरू आहे. यामागे भाजपचेच काही नेते आहेत. हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना सांगितले आहे. मावळ भाजप आणि प्रदेश कार्यकारणी यांच्यात समन्वय होत नाही तोपर्यंत माझी उमेदवारी जाहीर करू नका, असेही मी म्हटले आहे.