मुंबई : राज्यातील एसटी सेवा सुरळीत करण्यासाठी कंत्राटी चालक मोठय़ा प्रमाणावर घेण्यात असतानाच वाहकांचीही कमतरता महामंडळाला भासत आहे. त्यामुळे एसटीतून निवृत्त झालेल्या वाहकांची पुन्हा भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात निकष ठरवण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. हे वाहक कंत्राटी पद्धतीनेच घेणार की अन्य प्रकारे यावर निर्णय होईल.
गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या संपामुळे राज्यातील एसटी सेवा अद्यापही सुरुळीत झालेली नाही. त्यामुळे कारवाया मागे घेण्याचे आश्वासन देऊन महामंडळाकडून कामगारांना कामावर परत येण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनालाही प्रतिसाद मिळालेला नसून ८१ हजार कर्मचाऱ्यांपैकी अद्यापही ४७ हजार कर्मचारी संपात सहभागी आहेत. आतापर्यंत ७ हजाराहून अधिक चालक आणि ७ हजार ३४५ वाहक कर्तव्यावर हजर झाले असून सुमारे ४० हजार चालक, वाहक संपावरच आहेत. त्यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडलेले असून प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.