Manoj Jarange in Mumbai: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्याचा सरकारचा निर्णय रास्त ठरवल्यानंतर बुधवारी राज्य सरकारनेच ही परवानगी दिली. त्यानुसार आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांना एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जरांगेंनी हे मान्य करण्यास नकार दिला असून आता थेट देवेंद्र फडणवीसांबाबत त्यांनी मोठं विधान केलं आहे.

मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यासाठी बुधवारी सकाळी ते आंतरवली सराटीमध्ये गणेशपूजा करून निघाले. गुरुवारी सकाळी जुन्नरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मोठ्या जमावाने स्वागत केलं. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.