वडगाव मावळ : राज्यातील कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सोमावारी (दि.२) सन्मानित करण्यात आले . नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन २०१७,१८ आणि १९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषि विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते, तो कार्यक्रम आता सोमवारी (दि.२) घेण्यात आला. कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सोमवारी सकाळी ११ वा. तीन वर्षातील १९८ पुरस्कारार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने पवन मावळातील महिला शेतकरी प्राजक्ता गिरिधारी काळे यांना सन्मानित करण्यात आले असून त्यांना ५० हजार रुपये देण्यात आले आहे.
या कार्यक्रमात वसंतराव नाईक शेतिनिष्ठ पुरस्काराने मावळातील चांदखेड येथील नितीन चंद्रकांत गायकवाड (सन २०१७ ), येळसे येथील नितीन बबन ठाकर (सन २०१८), तसेच येळसे येथील मंगल मारुती दळवी (२०१९) या तीन शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांना प्रत्येकी ११ हजार रुपये देण्यात आले आहेत.



