पुणे : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस २० जूनला राज्यभरात आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तथा प्रवक्ता, कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी दिली आहे.
भारतीय सैन्यात ठेकेदारी पध्दतीने सैन्य भरती करणाऱ्या आणि भारतीय लष्कराची सुबद्ध व्यवस्था नष्ट करणाऱ्या अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध असून कृषी कायद्याप्रमाणे ही योजना रद्द करावी यासाठी २० जूनला राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.
देशभक्तीची खोटी झालर पांघरूण देशाची अस्मिता असणारी लष्करी यंत्रणा धोक्यात आणण्याचे काम या भाजपने केले आहे. सर्वसामान्य, शेतकरी, गरीब कुटुंबातील तरुण देशाच्या सेवेसाठी दाखल होतात आणि देशसेवा करतात.ती देशसेवा करण्याची संधी सैनिक म्हणूनच तरुणांना द्यावी. त्याला ठेकेदारीचे स्वरूप देऊन युवकांचा अपमान करू नये. युवकांना ठेकेदारी पध्दतीने सैन्यात भरती करून घेण्याचा निर्णय भाजपला मागे घ्यावाच लागेल. कारण या देशातील सच्चा देशभक्त आता जागा झाला आहे. अशी माहिती रविकांत वरपे यांनी दिली आहे.