मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज अखेर ठाण्याच्या विवियाना मॉल मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. आव्हाडांना जामीन मंजूर झाल्यानंतर ते न्यायालयाबाहेर आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.
जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी ‘तुमचं माझं नातं काय? जय शिवाजी, जय शिवाजी’अशी घोषणाबाजी केली. त्यांच्या घोषणाबाजीला कार्यकर्त्यांनी देखील उत्सफुर्त प्रतिसाद दिला.
जितेंद्र आव्हाड यांनी जामीन मिळाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपला पोलिसांवर रोष नाही, असं स्पष्ट केलं. तसेच आपल्याला पोलीस ठाण्यात ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे आपल्याला रात्रभर पोलीस ठाण्यात राहावं लागलं, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“ठाण्याच्या वर्तक नगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा या प्रकरणाशी शून्य संबंध आहे. त्यांची हतबलता मला प्रत्येक मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यांमधून फक्त अश्रू येणं बाकी होतं. बाकी सगळे हतबल होते. कारण असं कुणाला अटक करत नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“मला जी कलम 41 अ अन्वये नोटीस देण्यात आली होती ती दुपारी दोन वाजता मिळाली होती. आणि त्यामध्ये पाच वाजता हजर व्हावे, असं सांगितलं होतं. त्याआधीच त्यांनी मला अडीच वाजता अटक केली”, असा दावा आव्हाडांनी केला.


