ठाणे (मुंबई) : ठाण्यात दोन दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. ठाणे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी अटक केली होती. त्यांना आज मुंबई हायकोर्टाकडून जामीन मिळाला. जामिनानंतर जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांवर दबाब होता. आपल्यावर झालेल्या कारवाईमध्ये पोलिसांची काहीच चूक नव्हती, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेनंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. आव्हाडांना जामीन मिळताच त्यांना अटक करणाऱ्या डीसीपींची तातडीने बदली करण्यात आली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डीसीपी विनयकुमार राठोड यांची परिमंडळ 5 मधून वाहतूक शाखेत बदली करण्यात आलीय. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी जामीन मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीपी विनयकुमार राठोड यांचं नाव घेत आपल्या अटकेसाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता, असं म्हटलं होतं.
जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेनंतर डीसीपी विनयकुमार राठोड यांच्या बदलीची बातमी समोर आली. विनयकुमार राठोड यांची अशी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
जितेंद्र आव्हाड पोलिसांबद्दल नेमकं काय म्हणाले?
“ठाण्याच्या वर्तक नगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा या प्रकरणाशी शून्य संबंध आहे. त्यांची हतबलता मला प्रत्येक मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यांमधून फक्त अश्रू येणं बाकी होतं. बाकी सगळे हतबल होते. कारण असं कुणाला अटक करत नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.


