मुंबई : राज्यातील कोणत्याही माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये अन्य शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) प्रवेश नाकारला जाणार नाही. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.
शिक्षणाचा हक्क अधिनियमात विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल, अशी तरतूद आहे. अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा, अशी तरतूद आहे. त्यानुसार, जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गामध्ये प्रवेशदेण्यात यावा, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
या शासन निर्णयानुसार राज्यातील कोणत्याही शासकीय, महापालिका, नगरपालिका, खासगी अनुदानित, कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या, तसेच कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळास संलग्न असलेल्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात, तसेच माध्यमिक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गात अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल, अशा विद्यार्थ्यास शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) प्रवेश नाकारला जाणार नाही.
टीसीचे कारण देत, विद्यार्थ्यास प्रवेशापासून वंचित ठेवल्यास संबंधित शाळेविरुद्ध/ मुख्याध्यापकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याने नवीन शाळेत प्रवेश घेतल्यास, अशी नवीन शाळा विद्यार्थ्याची सरल पोर्टलवरील माहिती मिळविण्याची विनंती जुन्या शाळेकडे करेल आणि जुनी शाळा सात दिवसांच्या आत विनंती मान्य करेल. शाळेने अशी विनंती मान्य न केल्यास संबंधित केंद्रप्रमुख अशी विनंती त्यांच्या स्तरावरून मान्य करतील, असेही या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.



