मुंबई: महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका करताना या मोर्चाची नॅनो मोर्चा म्हणून संभावना केली आहे. सत्ताधाऱ्यांची ही टीका विरोधकांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून सत्ताधाऱ्यांच्या या टीकेचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. राज्यातील गुंगाराम सरकारला जनतेने मोर्चाच्या माध्यमातून नोटीस दिलीय. आता तुमचा बेकायदा सरकार कोसळणारच, असा हल्लाबोल दैनिक सामानातून करण्यात आला आहे.
शनिवारी मुंबईत निघालेला टोकदार आणि धारदार होता. हा मोर्चा निघू नये म्हणून राज्यातील गुंगाराम सरकारने नाना खटपटी केल्या. तरीही महामोर्चा निघालाच. या पुढेही आंदोलनाच्या तोफा धडधडत राहतील. मोर्चा यशस्वी झाला आहे. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे फडणवीसांनी तळमळून सांगितलं मोर्चा फेल झाला. याचाच अर्थ मोर्चा भव्य होता. मोर्चा यशस्वी झाल्याने सरकार टरकले आहे, असं सांगतानाच या मोर्चाने मिंधे-फडणवीस सरकारला नोटीस दिली आहे. तुमचा बेकायदा इमला कोसळत आहे, असा इशाराच सामनाच्या ‘अग्रलेखा’तून देण्यात आला आहे.
अग्रलेखात काय म्हटलंय?
बऱ्याच काळाने मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान जागविण्यासाठी असा मोर्चा निघाला. मराठी माणसाचे संयमी, तितकेच रौद्र रूप या मोर्चाने पाहिले. आता राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस वगैरे मंडळींनी सांगितले की, ‘मोर्चा फेल गेला. अपयशी ठरला. हा महामोर्चा नव्हे; हा तर नॅनो मोर्चा!” ज्यांना या मोर्चाचे भव्य स्वरूप दिसले नाही त्यांच्या डोळ्यांत ‘मऱ्हाटी द्वेषा’चा वडस वाढला आहे असेच म्हणायला हवे.
शनिवारचा मुंबईतील भव्य मोर्चा म्हणजे निवडणुका जिंकणारी ईव्हीएमची कलाकारी नव्हती. लाखभर जनता पदरमोड करून मुंबईच्या रस्त्यावर का उतरली? राज्याच्या मंत्र्यांवर भीतीच्या सावटाखाली फिरण्याची वेळ यावी हे कसले लक्षण समजायचे? मोर्चा फेल झाला असे सांगणाऱ्यांसाठी हा जनतेचा सवाल आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या मिंधे सरकारविरोधात मोर्चा निघाला हे लढ्याचे आणि संघर्षाचे पहिले पाऊल आहे. भविष्यात अशा अनेक पावलांखाली हे सरकार तुडवले जाईल.
महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान गिळून ढेकर देणारे सरकार महाराष्ट्रप्रेमी मोर्चेकरांचा असा अपमान करीत आहे. मोर्चा फेल झाला असे छाती पिटून विकट हास्य करीत आहेत. ही एक प्रकारची विकृती आहे. महाराष्ट्र अशा ‘गुंगारामां’च्या हाती सुरक्षित नाही व या गुंगारामांची झोप उडण्याची चिन्हे दिसत नाहीत, मात्र ती उडवावीच लागेल. मुंबईतील महामोर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाआधी निघाला.



