नागपूर: चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकंवर काढलंय. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चीनमध्ये हाहाकार उडाला आहे. कोरोना संसर्गाला आवरणं हे प्रशासनाच्या हाताबाहेर गेलं आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स शिल्लक नाहीयत. परिस्थिती सांभाळताना चीन सरकारच्या नाकीनऊ आले आहे. चीनमधलं हे संकट भारतात येऊ नये यासाठी केंद्र सरकार सतर्क झालं पाहिजे. विशेष म्हणजे या संकटाचे पडसाद आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहातही पडताना दिसले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घोंघावणाऱ्या या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
गेल्या तीन वर्षात जगभरात ‘कोरोना’ने थैमान घातले आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन करावा लागला. या पार्श्वभूमीवर राज्यात काय खबरदारी, उपाययोजना केली जात आहे ? असा सवाल अजित पवारांनी केला.
कोरोना’ संकटाबाबतचा प्रशासनाला अनुभव आहे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाची परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळली होती. ‘कोराना’च्या नवीन व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असं अजित पवार सभागृहात म्हणाले.
राज्य सरकारने ‘कोरोना’चा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात आज केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या माध्यमातून तातडीने टास्क फोर्स उभारणार असल्याची माहिती दिली.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात दुबईतून आलेल्या जोडप्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढला. चीन, जपान, कोरिया, ब्राझिल या देशांत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडत आहे आणि कोविडची साथ पुन्हा सुरू झाली आहे.



