देहुगाव :- मित्रांसोबत धुलीवंदन खेळून झाल्यावर हातपाय धुण्यासाठी गेलेला विद्यार्थी इंद्रायणी नदी पत्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.7) दुपारी 12:30 वा. वराळे ता. मावळ जि. पुणे हद्दीत घडली.
जयदीप पुरुषोत्तम पाटील (वय 21, रा. तारखेड, पाचोरा जि. जळगाव) नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार आंबी येथील डॉ. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील 7 ते 8 विद्यार्थी धुलीवंदन खेळले. त्यानंतर सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले असता जयदीप पाटील याचा पाय घसरून तो खोल पाण्यात बुडाला. त्याचा मित्र शरद शिवाजी राठोड याने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित सावंत, पोलीस उप निरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी, पोलीस अंमलदार युवराज वाघमारे, सचिन कचोळे, शिवाजी बांगर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थापक निलेश गराडे त्यांची टीम दाखल झाली.
बोटीच्या साहाय्याने बुडालेल्या विद्यार्थ्याचा दोन तास शोध घेऊन मृतदेह नदीपात्रातुन बाहेर काढला. बुडालेला विद्यार्थी हा अभियांत्रिकी संगणक तृतीय वर्षात शिकत होता. धुलीवंदन खेळणे विद्यार्थ्याच्या जीवावर उठले. या अपघाताचा तपास पोलीस उप निरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी करत आहेत.




