हिंजवडी (वार्ताहर) वाकड – हिंजवडीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. तब्बल आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवातील बगाड मिरवणूक ही या यात्रेचे खास आकर्षण असते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ही मिरवणूक असते.
बगाडासाठी लागणारे शेले (लाकूड) आणण्यासाठी शनिवारी (दि. १) सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत शेकडो शेलेकरी मुळशी तालुक्यातील दुर्गम भागातील आडगाव बारपेच्या दिशेने पैस, पैस… म्हातोबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत रवाना झाले.
शेलेकऱ्यांना निरोप देण्यासाठी ग्रामस्थ व महिला भाविकांनीअभूतपूर्व गर्दी केली होती. या वेळी महिलांनी औक्षण करून साखर, पेढे, मिठाई भरवून शेलेकऱ्यांना भावपूर्ण अंतःकरणाने निरोप दिला. या वेळी पैस पैस, तसेच म्हातोबाच्या नावानं चांगभलं चांगभलं बोला चांगभलंच्या जय घोषाने अवघी आयटीनगरी दुमदुमली होती.
हनुमान जयंतीच्या म्हणजेच यात्रेच्या १० दिवस आधी देव बसतात आणि वाकड-हिंजवडी ग्रामस्थांचा उपवास सुरू होतो. या १० दिवसांत प्रत्येकाच्या घरी देवाची पूजा होत नाही. बगाडाला नैवद्य दाखवूनच उपवास सोडला जातो. चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीला दुपारी ४ नंतर हिंजवडी गावठाणातून वाकडच्या दिशेने बगाड मिरवणूक निघते. मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मुळशी तालुका, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातून भाविक वाकड, हिंजवडीत जमतात. प्रस्थान झालेल्या शेलेकऱ्यांचा पहिला मुक्काम आसदेत व दुसरा मुक्काम आडगाव बारपे येथे असतो. सोमवारी पहाटे शेल्याची निवड करण्यात येणार असून, सकाळी महाप्रसाद घेऊन हे शेले खांद्यावर घेऊन शेलेकरी हिंजवडीच्या दिशेने पायी मार्गस्थ होणार आहेत.
रस्त्यात पुन्हा आसदेत मुक्काम करून हनुमान जयंतीच्या दोन दिवस आधी शेलेकरी हिंजवडीत दाखल होतील. त्यानंतर आणलेले लाकूड बगाड रथावर लावून बगाड मिरवणुकीत या लाकडावर गळकऱ्याला बसवून गोलाकार फिरवले जाते. हा अविस्मरणीय सोहळा भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो.
सचिन जांभुळकर, सरपंच.




