लोणावळा : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे रस्त्यावर येणाऱ्या खाजगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर शनिवार पासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः एक्सप्रेस हायवेच्या खंडाळा बोर घाट परिसरात वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावला असून वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शनिवार, रविवार व महाराष्ट्र दिन सोमवारी आल्याने सलग तीन दिवस सुट्ट्या जोडून आल्या आहेत. या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने खाजगी वाहनांमधून पर्यटनासाठी घराबाहेर पडल्याने शनिवारी सकाळपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वे जाम झाला आहे. सदरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खंडाळा बोगदा परिसरात महामार्ग पोलिसांकडून दहा दहा मिनिटांचे ब्लॉक घेत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने थांबवत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने सर्वच्या सर्व सहा लेन वरून सोडली जात आहेत. यामुळे पुणे मुंबई लेनवर देखील वाहतूक कोंडी होत आहे तर मुंबई पुणे लेनवर खालापूर टोलनाक्यापासून खंडाळ्यापर्यंत प्रवासी वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. या वाहतूककोंडीत सापडल्याने वाहन चालकांचे व वाहनांमधील प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

सतत वाढत जणाऱ्या वाहनांच्या संख्येपुढे एक्सप्रेस हायवे क्षमता देखील कमी पडू लागली आहे. खंडाळा बोर घाटात तर या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या घाटाला पर्याय म्हणून सुरू असलेल्या मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरीही अजून किमान एक वर्ष त्यासाठी वाट बघावी लागणार आहे. तोवर ही कोंडी प्रवाशांसोबतच वाहतूक नियंत्रण यंत्रणांना देखील मोठी डोकेदुखी होऊन राहणार आहे. यातच एक्सप्रेस हायवे वर कोंडी झाल्यानंतर वाहनचालक सर्रास खोपोली व लोणावळा खंडाळा शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतात यामुळे दोन्ही शहरांमधील अंतर्गत रस्त्यांवर देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत.
एक्सप्रेस हायवेवर मुंबई पुणे लेनवर वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने किलोमीटर क्रमांक 39 ते किलोमीटर क्रमांक 45/500 पर्यंत वाहतूक संत गतीने चालू आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी किलोमीटर क्रमांक 44/100 ते खंडाळा बोगदा या दरम्यान थोडया थोड्या वेळाने 10 मिनिटांचा ब्लॉक घेऊन मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक थांबवून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहनं सर्वांच्या सर्व लेनने सोडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती बोरघाट महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी दिली. दरम्यान या वाहतूक कोंडीमुळे वाहनांची इंजिन गरम होऊन वाहनं बंद पडण्याच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत करणं यंत्रणासाठी अजूनच क्लिष्ट काम झालं होतं. हवं टाळण्यासाठी वाहनचालकांनी आपल्या गाडीचे एसी बंद ठेवण्याचे अवाहन यंत्रणांकडून करण्यात येत आहे.
बोर घाट पोलीस, खंडाळा महामार्ग पोलीस, लोणावळा, खोपोली, खालापूर पोलीस स्टेशनचा स्टाफ, महाराष्ट्र सुरक्षा बळ, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करताना दिसत होती. महाराष्ट्र शासनाने मिसिंग लिंकचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून रस्ता सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करून वाहतूक कोंडीचा हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी प्रवासी नागरिक करीत आहेत.




