
गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लावलेल्या दारूभट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. यात 12 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 18) सायंकाळी साडेपाच वाजता खेड तालुक्यातील कोयाळी गावात करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई अनिल राक्षे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाली असता आळंदी पोलिसांनी दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या कारवाई मध्ये 12 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.



