मुंबई : कर्जदारांसाठी एक दिलासादाय व आनंदाची बातमी समोर येत आहे. आज भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) पतधोरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आरबीआयने कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळं कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून, मासिक हप्ता अर्थातं ईएमआयमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
रेपो रेट ‘जैसे थे’.
दरम्यान, आरबीआय रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवल्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. अशा स्थितीत रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम राहिला आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक ८, ९ आणि १० ऑगस्ट या तारखेला झाली, ज्यामधील निर्णय आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज जाहीर केले. त्यामुळं सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कर्जाचा दर स्वस्त असताना लोकांनी घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी याचा फायदा घेतला. मात्र आता त्यांना हप्ते भरणे कठीण होत आहे.
खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ
अमेरिकेची केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने अलीकडेच व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सने वाढ केली. यानंतर भारतावरही व्याजदर वाढीचा दबाव वाढला. तसेच अलीकडे देशात खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने महागाई नियंत्रित करण्यासाठी आरबीआय पॉलिसी दर सलग तिसऱ्यांदा अपरिवर्तित ठेवणे अपेक्षित होते.



