मुंबई: महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची तसेच क्रांतिकारांची भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांच्या या भूमीतील मराठी माणसांना गृहीत धरण्याचे काम केंद्रातील आणि राज्यातील सरकार करत आहे. परंतु मराठी माणूस यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. याच धास्तीपोटी हे सरकार निवडणुका घेत नसल्याचा दावा एनएसयूआयचे प्रभारी कन्हैया कुमार यांनी रविवारी व्यक्त केले. मुंबईच्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशातील बेरोजगारी, शिक्षणक्षेत्रातील समस्या, शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या आदी मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचा आणि मुंबईचा वाटा खूप मोलाचा आहे. परंतु आज हीच मुंबई पंतप्रधानांच्या मित्राला आंदण देण्याची तयारी केंद्र आणि राज्यातल्या सरकारने चालवली असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या प्रकरणावरही कन्हैय्या यांनी भाष्य केले. ड्रग्जचे अतिप्रचंड साठे अदानी यांच्या ताब्यात असलेल्या मुंद्रा बंदरातच कसे मिळतात, यावर केंद्रीय गृहमंत्रालय काहीच बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
फडणवीस यांचा ‘अडवाणी’ केला…
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कन्हैया कुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. आजकाल त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीच्या गाण्याचे व्हिडीओ जास्त बघितले जातात, असे सांगत आपल्याला फडणवीस यांची दया येत असल्याचे कन्हैया म्हणाले. केंद्रातील त्यांच्या मदाऱ्यांनी त्यांचा पार ‘अडवाणी’ केला आहे. १०५ आमदार असूनही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला मुख्यमंत्रिपदी बसवून त्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करावे लागत आहे, असे ते म्हणाले.



