पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनंतर आता पुणे जिल्ह्यात आणखी एक महापालिकेची स्थापना होणार आहे. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण केली जाणार आहे. याबाबत अभिप्रायासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून राज्य शासनाने अहवाल मागविला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमहापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश होऊन महापालिकांची हद्दवाढ झालेली आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या परिसरातील नवीन गावांचा या दोन्ही महापालिकेत समावेश करणे योग्य होणार नाही.चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण करणे याबाबत मागणी होत आहे.
खेड तालुक्यात चाकण, आळंदी आणि राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या परिसरालगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महापालिका करणे राज्य शासनाच्या विचाराधिन आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात तिसरी महापालिका नव्याने होणार आहे.




