लोणावळा : मुंबई-पुणे महामार्ग सकाळी ११ ते दुपारी २ वाजे पर्यंत रेल्वे कॉरीडोरचे काम करण्यासाठी पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. यामुळे कळंबोली येथे मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे २००२मध्ये तयार करण्यात आला. ९४ किलोमीटरच्या या महामार्गामुळे पुणे आणि मुंबई दरम्यानचे अंतर कमी झाले. दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक गतिमान झाला. परंतु २००२ नंतर आता २०२३ मध्ये या महामार्गावर वाहनांची संख्या मोठी वाढली आहे. या ‘द्रुतगती महामार्गा’वर आता क्षमतेपेक्षा अधिक वाहने धावत आहे. त्यामुळे अपघात होणे, वाहतूक कोंडी हे प्रकार होत आहे. यावर राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या मार्गावर आणखी लेन करण्यात येणार आहे. आता राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) प्रस्ताव तयार केला गेला आहे. यामुळे या मार्गावर दोन लेन वाढणार असून वाहतूक कोंडी संपणार आहे.
काय होती क्षमता…..
मुंबई पुणेसाठी एक्स्प्रेस-वे उभारताना भविष्याचा विचार केला गेला होता. या मार्गावरुन रोज ४० हजार वाहने जातील, असा आराखडा तयार करुन महामार्ग तयार केला गेला. परंतु आता या महामार्गावरुन रोज ६० हजार वाहने जात आहेत. वीकेंडला म्हणजे शनिवार अन् रविवारी हा आकडा ८० ते ९० हजारांवर जातो. यामुळे एक्स्प्रेस-वेवर नेहमी वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनामुळे महामार्ग ठप्प झाला होता. तसेच अपघातामुळे हा प्रश्न गंभीर होतो.




