मुंबई : बारामतीत महायुतीचा मार्ग मोकळा? वर्षा बंगल्यावर शिवतारे-अजित पवार यांच्यातील वादावर पडदा! फडणवीसांच्या मध्यस्थीला यश आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद अखेर मिटला असून दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याची माहिती आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात मध्यस्थी करत ही समेट घडवून आणल्याची समोर आलं आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतल्या नेत्यांमधील वाद आता जवळपास संपुष्टात आला आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमधून शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपली उमेदवारी घोषित केली होती. अजित पवार आणि शरद पवारांवर हल्लाबोल करत बारामतीत पवारांविरोधात उमेदवारी अर्ज भरणारच असा निर्धार विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळे बारामतीत लोकसभेची तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. शिवतारे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने कारवाई केली पाहिजे, असं अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटलं होतं. अशातच काल (बुधवारी ता. २७) पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे यांच्यासोबत वर्षा या शासकीय निवास्थानी चर्चा केली. यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीनंतर विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.



