तळवडे : मनोज जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मराठा बांधवांना मोठे आवाहन केले आहे. “सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल, त्या व्यक्तीच्या बाजूने रहा. उमेदवार होण्यापेक्षा उमेदवार पाडणारे बना, त्यात मोठा विजय असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले?
तळवडे येथे आयोजित कीर्तन सप्ताहासाठी जरांगे-पाटील आले असताना त्यांनी माध्यांमाशी संवाद साधला. त्यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, ‘‘मराठा समाजामध्ये सरकारबाबत शंभर टक्के रोष आहे आणि तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल. आमचा मार्ग हा राजकीय नाही. आम्हाला आरक्षण महत्त्वाचे असल्याने आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही, किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही.
ही निवडणूक मराठा समाज आपल्या हातात घेईल आणि ज्याला पाडायच आहे, त्याला नक्कीच पाडेल. पुढे ते म्हणाले, मला बाजूला करण्यासाठी गृहमंत्र्यांनी अनेक प्रयत्न केलेत. परंतु, मी बाजूला झालो नाही. सध्या महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. आमिश दाखवून माणसं फोडली जात आहेत. हे सर्व सरकारला जड जाईल. येत्या सहा जूनपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास विधानसभा काबीज करणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमचा संपर्क नाही. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांनी मराठा समाजाला काही दिलेलं नाही. कोणाला निवडून आणायचं हे समाज ठरवेल. जो सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्याच्या बाजूने रहा असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.



