
शिवसेनेला येत्या विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा हव्यात असं सांगताना रामदास कदम म्हणाले की, आमच्याकडे आता 50 आमदार आहेत. गेल्या वेळी आम्ही 100 पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या. त्यामुळे आता आम्हाला 100 जागा हव्यात. त्या दिल्या नाहीत तर सगळ्या जागा आमच्याच. भाऊ भाऊ म्हणता मग वाटून खाऊ. उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या 21 जागा लढवल्या, मग आम्हाला कमी का मिळाल्या. आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या तर आणखी खासदार निवडून आले असते. तुलाही नाही आणि मलाही नाही असं व्हायला नको. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला सत्ता आणायची आहे.
सर्व्हेच्या नावाखाली उमेदवार बदलले
भाजपला देखील सर्व्हेचं प्रकरण पटलं नसावं. फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी सर्व्हे पुढे केला का असा प्रश्न पडतो. सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, काही उमेदवार आमच्यावर लादले. पण भाजपच्याही जागा पडल्या, त्यावर काय म्हणायचं? भावना गवळी, हेमंत गोडसे नको असं भाजपचं मत होतं. पण आम्ही तुमच्या जागांवर कधी बोललो का? तुमच्या उमेदवारांवर आक्षेप घेतले का?
अजित पवार यांची प्रशासनावर पकड चांगली आहे, ते चांगलं काम करतात. माझं म्हणणं एवढंच होतं की, त्यांना महायुतीत घ्यायला थोडा उशीर झाला असता तर त्यांच्या वाट्याला गेलेली 9 मंत्रिपदं आम्हाला मिळाली असती. एकनाथ शिंदेंनी ज्यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता, ते बिचारे जॅकेट घालून बसले नसते. 9 मंत्रिपदं मिळाली असती तर त्यामुळे शिवसेनेची बांधणी अधिक भक्कम झाली असती. महायुतीचा लोकसभेत पराभव का झाला याचं विश्लेषण तीनही पक्षांनी करावं असं रामदास कदम म्हणाले.



