मुंबई: ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे जालन्यातील वडीगोद्री गावामध्ये उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस असून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ना? यासह आदी प्रश्न लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला केले आहेत. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. आज ओबीसी शिष्टमंडळाची राज्य सरकारबरोबर महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत ओबीसी समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून ओबीसींवरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच ओबीसी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी उपसमिती स्थापन करण्यात येईन, असा निर्णय घेण्यात आल्याची माहीतीही छगन भुजबळ यांनी दिली.
सरकारबरोबर काय चर्चा झाली?
ओबीसी शिष्टमंडळाची सरकारबरोबर बैठक पार पडली. या बैठकीत काय चर्चा झाली? त्यासंदर्भातील माहिती देताना छगन भुजबळ म्हणाले, “ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांच्यासह काहीजण उपोषणाला बसले आहेत. ते उपोषण सोडावं म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावलं होतं. आजच्या बैठकीत खूप चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, खोटी कुणबी प्रमाणपत्र कोणालाही दिले जाणार नाही. जर काही कुणबी प्रमाणपत्र खोटे असतील तर आम्ही ते तपासून घेऊ. तसेच खोटी प्रमाणपत्र घेणारे आणि देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.



