मुंबई  : विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे वाढले असून मतदारसंघाचा आढावा, बैठका, मेळावे, सभा असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? याबाबतही चर्चा सुरु आहेत. अशातच आगामी विधानसभेसाठी महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार? याबाबतही खलबतं सुरु आहेत. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक भाष्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ठाकरे-२ सरकार येणार असल्याचा मोठा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

विधानसभेची निवडणूक घेण्याची त्यांची इच्छा नसली तरी त्यांना घ्यावी लागेल. निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल. नोव्हेंबरमध्ये त्यांना विधानसभा अस्तित्वात आणावी लागेल. हरियाणा, झारखंड, जम्मू-कश्मीर आणि महाराष्ट्रातील निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागतील. जसं घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे तसं निवडणुकींच्या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतील. मात्र, महाराष्ट्रातील जनता आणि विरोधी पक्ष जागृत आहे, आणि आमचंही लक्ष आहे. विधानसभेची निवडणूक वेळेवर व्हायलाच पाहिजे, कारण आम्हाला खोकेवाल्यांचं सरकार घालवायचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.