
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला फटका बसला. त्यामुळे महायुती सरकारने अनेक योजनांचा बार उडवला. त्यामुळे योजना सगळ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत निवडणुका लांबणीवर जाणार अशी चर्चा रंगली आहे. पण आता निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. आयोगाची एक टीम महाराष्ट्रात येणार असून निवडणुका वेळेवरच होणार अशी शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू असून ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निश्चित कार्यक्रम तयार केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची टीमचा महाराष्ट्र दौरा निश्चित झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही टीम महाराष्ट्रात येणार आहे. या टीममध्ये, 10 ते 12 केंद्रीय निवडणूक आयोग प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे.
विशेष म्हणजे, देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही सहआयुक्त या टीमचं नेतृत्व करणार आहेत. आगामी महाराष्ट्र निवडणूक कार्यक्रमावर ही टीम शिक्कामोर्तब करणार अशी शक्यता आहे. विधानसभा निवडणूक घोषित करण्यातील सगळ्यात महत्त्वाचा हा दौरा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम राज्यातील प्रशासकीय यंत्रणासोबत संपूर्ण आढावा बैठक घेणार आहे.
निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं काय आहे प्लॅनिंग?
अलीकडेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबतही मोठी घोषणा केली आहे. ‘2019 साली महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एकत्र निवडणुका झाल्या होत्या. महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपतोय, तर हरियाणाचा 3 नोव्हेंबरला, त्यावेळी जम्मू काश्मीरचा विषय नव्हता. यावेळी 4 निवडणुका एका वर्षात घ्यायच्या आहेत’, असं केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी आधीच स्पष्ट केलं होतं.
महाराष्ट्रात विधानसभा कार्यकाळ संपण्याआधीच निवडणुका होणार आहेत, असं केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे 26 नोव्हेंबरआधी महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात येईल. म्हणजेच दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात निवडणुका होतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
