लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जागावाटपात काँग्रेसने अधिक जागांची मागणी केली असल्याचं बोललं जात आहे. तसेच काही काँग्रेस नेते मुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळावं अशी इच्छा व्यक्त करत आहेत. या सर्व घटना पाहता काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे, असं म्हटलं जात आहे. यावरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “केवळ काँग्रेसचाच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीचाच आत्मविश्वास वाढलेला आहे”.

संजय राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर आमचा सर्वांचाच आत्मविश्वास वाढला आहे. मात्र आता विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत आत्मविश्वास मिळावा यासाठी एकत्र काम करावे लागेल. तिन्ही पक्षांना एकत्र राहावं लागेल आणि काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला म्हणून ते काही एकटे लढणार नाहीत. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय ते शक्य होणार नाही. महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? आत्मविश्वास वाढला आहे असं कोणाला वाटत असेल तर तो आत्मविश्वास कोणाचा आहे? कशामुळे आहे? कसा आहे? हा अभ्यासाचा विषय आहे.