कोल्हापूर : आधीच कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या चौघा बड्या नेत्यांनी महाविकास आघाडीचा रस्ता पकडला असताना आता महायुतीशी संलग्न जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी स्वतःची ताकद दाखवायला सुरुवात केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, ताराराणी पक्षाचे प्रकाश आवाडे आणि नव्याने स्थापन झालेल्या राजर्षी शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर या तिन्ही साखर सम्राट माजी मंत्र्यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असल्याने हा गुंता सोडवणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरचे कडवे आव्हान असणार आहे.
इचलकरंजीत प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांची प्रत्यक्ष यादी संपत नाही. या प्रकाराला कंटाळून आता या वेळच्या निवडणुकीत त्यांनी पुत्र राहुल आवाडे यांना आखाड्यात उतरवण्याची तयारी केली आहे. याच वेळी हातकणंगलेमध्ये जयश्री कुरणे यांची उमेदवारी जाहीर करून दबाव वाढवला आहे. शिरोळ मध्ये आमदार राजेंद्र पाटील यांची भूमिका काय ठरते आणि महायुतीचा निर्णय काय होतो हे पाहून येथे आवाडे आपला उमेदवार जाहीर करतील असे दिसत आहे. यामुळे इचलकरंजी येथेही देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालून महायुतीत टोकदार तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल असे चित्र आहे.
शिरोळ तालुक्यात अनपेक्षित राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीच्या छावणीतून ठाकरे सेने कडे आणि तेथून शिंदे सेनेकडे आलेले राजेंद्र पाटील यांच्यासमोर कोणता झेंडा घेऊ हाती असा पेच निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीला राज्यात महाविकास आघाडीला यश मिळाले असल्याने त्यांची मनस्थिती द्विधा झाली आहे . शिरोळ मध्ये दलित, मुस्लिम हा वर्ग मोठा आहे. जयसिंगपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीवरून मागासवर्गीयांशी संघर्ष झडला होता. याचा विपरीत परिणाम होऊ नये याची दक्षता घेत यांनी राजर्षी शाहू आघाडी स्थापन करून परिवर्तनाच्या दिशेने जात असल्याचा संदेश दिला आहे. त्यांचे बंधू जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर हे या आघाडीचे अध्यक्ष आहेत. तर शिरोळमध्ये यड्रावकर आमचे उमेदवार असतील असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजेंद्र पाटील हे पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत स्वगृही परतणार की राज्यातील मतदारांचा बदललेला कल लक्षात घेऊन शाहू आघाडीच्या माध्यमातून मध्यम मार्गी वाटचाल करणार हे महत्त्वाचे ठरले आहे. या घडामोडी पाहता आमदार पाटील यड्रावकर यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांना येथे लक्ष घालण्याची वेळ आली आहे. एकंदरीत कोल्हापूरातील तिन्ही अपक्ष आमदारांनी घेतलेली भूमिका आणखी टोकदार होण्यापूर्वीच मार्ग काढण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना झटावे लागेल असे दिसत आहे.



