
मुंबई: विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत असे असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते , खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांची भेट घेतली. तसेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काही माध्यमातून या आशयाची वृत्तेही प्रकाशित झाली आहे. त्याबाबत आता संजय राऊत यांनी स्वतः भाष्य करत हे दावे फेटाळून लावले आहेत. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी या दाव्याचे खंडन करत विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत म्हणाले, ” संजय राऊतांची अमित शहांशी भेट झाली हे सांगितलं जातय, ही हास्यास्पद गोष्ट आहे. काँग्रेस नेते असे दावे करत असतील तर त्यांचंही आश्चर्य वाटत आहे. शिवसेनेने फक्त संघर्ष केलेला नाही, तर आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आमचा पक्ष फोडला, आमचं सरकार पाडलं. आमचं चिन्ह त्यांनी चोरलं. त्याही पेक्षा हा महाराष्ट्र त्यांनी गद्दारांच्या हातात दिला. या वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. कोणी आमच्यावर शंका घेत असतील, तर ते एका बापाची औलाद नाहीत. त्यांनी त्यांचा बाप दाखवावा अन्यथा श्राद्ध घालावं”, असा घणाघात राऊत यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, ” शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणारांशी आम्ही हात मिळवणी करणार नाही. भाजपशी हात मिळवणी करणे म्हणजे औरंगजेब आणि अफजल खानाशी हात मिळवणी करणे.
