
पुणे : दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. फटाक्यांच्या धुरामुळे हवेत नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईडबे प्रदूषक मिसळतात. या विषारी हवेमुळे अनेकांना श्वसनास त्रास होतो. आधीपासूनच श्वसनविकार असलेल्या रुग्णांना यामुळे दीर्घकालीन त्रास होऊ शकतो. यामुळे दिवाळीच्या कालावधीत योग्य काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
दिवाळीच्या काळात आनंद साजरा करण्यासाठी फटाके मोठ्या प्रमाणात वाजविले जातात. सर्वसाधारणपणे संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत फटाके वाजविण्यात येतात. यामुळे हवेतील घातक वायूंचे प्रमाण संध्याकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत वाढलेले असते. इमारतीच्या आवारातच रहिवासी फटाके वाजवितात. या फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर बाहेर जाण्यासही जागा नसते. त्यामुळे घरांमध्ये आणि आजूबाजूच्या वातावरणात ही विषारी हवा दीर्घकाळ राहते. या हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास होतो.
फटाक्यांच्या धुरामुळे खोकला, छातीतून घरघर आवाज येणे आणि घशाला खवखव असे त्रास लगेच सुरू होतात. याचबरोबर दिवाळीनंतर दम्यासह इतर गंभीर श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. हवेतील प्रदूषकांची वाढती पातळी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय धोकादायक असते. कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने ते आजारी पडण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती ससून सर्वोपचार रुग्णालयातील श्वसनविकार विभागाचे प्रमुख डॉ. संजय गायकवाड यांनी दिली.



