पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक (आयटी) पार्ककडून जलप्रदूषण होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आयटी पार्कमधील समाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील सांडपाणी मुळा नदीत थेट सोडण्यात येत असल्याचा ठपका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला आहे. याप्रकरणी आयटी पार्कला नोटीस बजाविण्यात आली आहे.
प्रदूषित पाण्यामुळे मुळा नदीतील माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयटी पार्कमधील समाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची २४ सप्टेंबरला तपासणी केली. या तपासणीत प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक गंभीर त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन आढळून आले. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ४ मेगालिटर असताना प्रत्यक्षात तिथे प्रतिदिन १.५ मेगालिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे आढळून आले. आयटी पार्कमध्ये सांडपाणी वाहिन्यांचे जाळे अपुरे असल्याने हा प्रकल्प कमी क्षमतेने सुरू आहे, असे मंडळाने नोटिशीत म्हटले आहे.
एमआयडीसी, प्रदूषण मंडळ आमनेसामने
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) तीन वेळा नोटीस बजावली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत या नोटिसा आहेत. कुरकुंभ एमआयडीसीला सप्टेंबरमध्ये, रांजणगाव एमआयडीसीला ऑक्टोबरमध्ये आणि आता हिंजवडी आयटी पार्कला नोटीस बजाविण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी आमनेसामने आले आहेत.
आयटी पार्कमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प त्रयस्थ संस्थेमार्फत चालविला जातो. त्यांच्याकडून याबाबत माहिती घेतली जाईल. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीला योग्य उत्तर दिले जाईल.
– संजय इंदुले, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ
हिंजवडी आयटी पार्कमधील समाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. याबाबत बजाविण्यात आलेल्या नोटिशीला उत्तर देण्यास महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाला सात दिवस देण्यात आले आहेत. याचबरोबर २२ नोव्हेंबरला मंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.
– जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ




