भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ गावजत्रा मैदानावर जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे या वेळी उपस्थित होते.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारत निर्माण झाला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ सुरू आहे. सगळ्यांना सुरक्षा आणि कोणामध्येही भेदभाव नाही. भारताला जोडणारी ताकद महायुतीत आहे, तर महाआघाडी ही महाअनाडी आहे. या महाअनाडीकडे नीती, नियत आणि निर्णय घेण्याचे सामर्थ्य नाही. परिवाराचा विकास एवढाच यांचा नारा आहे. केवळ काँग्रेसच्या खानदानी परिवाराचा विकास सुरू आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘भारताचा पाया हा सनातन आहे आणि सनातनवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे. ‘बटे थे तब कटे थे, अब बटेंगे नहीं… एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या भावनेतून आपल्याला कार्य करायचे आहे.
देशात काँगेसचे सरकार असताना पाकिस्तान भारतात घुसखोरी करत होता. वारंवार घुसखोरी होत होती, दहशतवादी हल्ले होत होते. दहशतवादी कारवायांना काँग्रेसने रोखले नाही. या मुद्द्यावर आवाज उठवू नका, कारण संबंध खराब होतील, असे आम्हाला सांगत होते. काँग्रेस देशाच्या किमतीवर पाकिस्तानशी संबंध सुधारत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात ‘हम छेडेंगे नहीं लेकिन हमें छेडेंगे तो छोडेगे नहीं’ असा संदेश जगभरात गेला आहे. देशाच्या समस्येचे कारण काँग्रेस आघाडी आहे, तर समस्यांवरील समाधान महायुती आहे.’
‘विशाळगडावर अतिक्रमण हटविण्यास गेल्यानंतर दगडफेक केली जाते. गडावर अतिक्रमण का झाले, अयोध्या, काशी, मथुरा, १९४७ मध्ये लाखो हिंदूंची हत्या का झाली, गणेश विसर्जन मिरवणूक, रामनवमी शोभा यात्रेवर दगडफेक का होत होती, कारण आपण विभागलो होतो,’ असेही ते म्हणाले.




