
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अखेर संपन्न झाला असून तीन मंत्र्यांचं सरकार आता कामाला लागले आहे. ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. पाठोपाठ, विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं असून आज विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत आहे.
सकाळी ११.३० वाजता आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. सर्वप्रथम देवेंद्र फडणवीसांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ, गिरीश महाजन यांनी शपथ घेतली. १५ व्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनास शनिवारपासून सुरुवात होत आहे. शनिवार व रविवार अशा दोन दिवसांत सर्व २८८ सदस्यांचा शपथविधी पार पडेल. सोमवारी सकाळी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर राज्यपालांचे नवीन विधानसभेपुढे अभिभाषण होईल. अखेरच्या सत्रात पुरवणी मागण्या, विधेयके सादर केली जातील.
कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष
विधानसभेतील सर्वांत ज्येष्ठ सदस्य कोळंबकर यांची हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात शपथ दिली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. कोळंबकर हे शिवसेना, काँग्रेस व भाजप अशा तीन पक्षांकडून आतापर्यंत नऊ वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.
७८ जणांची पहिल्यांदा शपथ
१५व्या विधानसभेत ७८ सदस्य हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. या नवीन चेहऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे ३३, शिवसेना (एकनाथ शिंदे) १४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ८, शिवसेना (उद्धव ठाकरे) १०, काँग्रेस ६ आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार) चार सदस्यांचा समावेश आहे. त्याशिवाय तीन अपक्ष व किंवा छोट्या पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. सदस्यांना सभागृहात बोलणे किंवा भाषण करण्यासाठी ही शपथ घ्यावी लागते.



