
मुंबई: राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांनी उमेदवारीसाठी पक्षांतर केलं होतं. उमेदवारी मिळावी म्हणून काही बड्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षात उडी घेतली. मात्र, तरीही काहींच्या पदरी निराशा आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना आता पुन्हा परतीचे वेध लागल्याचं दिसून येत आहे. विधानसभेच तिकीट मिळवण्यासाठी भाजप सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले नेते पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत अशी माहिती आहे. साथ सोडलेले नेते भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. निवडणुकीआधी उमेदवारीसाठी गेलेल्या आणि आता पुन्हा एकदा परतीचे वेध लागलेल्यांना पक्षात घ्यायचे की नाही याबाबत भाजपमध्ये अद्याप निर्णय झालेला नाही.
कोकणातील एका नेत्याने घेतली बावनकुळे यांची भेट
त्याचबरोबर कोकणातील एका नेत्याने नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले संजय काका पाटील देखील भाजपमध्ये परतण्यास इच्छूक असल्याची माहिती समोर आली आहे. संजय काका पाटील यांचा देखील विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर आता ते अजित पवारांच्या पक्षातून पुन्हा एकदा भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. निवडणुकीपुर्वी समरजीत घाडगे, हर्षवर्धन पाटील, बाळ माने, राजन तेली यांच्या सारख्या काही महत्वाच्या नेत्यांनी भाजपची साथ सोडली होती.
भाजप पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊनही विधानसभेत मिळालेल्या मोठ्या पराभवानंतर पक्षांतर केलेल्या या नेतेमंडळींत अस्वस्थता निर्माण होतानाचं चित्र आहे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी पुन्हा घरवापसी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये सांगलीचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे नेते संजय काका पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. संजय पाटील पुन्हा भाजपात येतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
